सर्वसामान्य माणसानं पाणी देयक न भरल्यास त्याचं पाणी कापणारं प्रशासन जकात कराच्या ४०० कोटी रूपयांच्या थकबाकी वसुलीसाठी का प्रयत्न करत नाही असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते संजीव दत्ता यांनी उपस्थित केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महापालिकेकडे ४०० कोटी रूपयांचा जकात कर बाकी आहे. जकात कर बंद होऊन स्थानिक स्वराज्य संस्था कर लागू झाला. स्थानिक स्वराज्य संस्था कर बंद होऊन वस्तू आणि सेवा कर लागू झाला आहे. कोरोनामुळे ठाणे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून त्यामुळं महापालिका मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न करत आहे. सध्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टी न भरल्यास घरातील मौल्यवान वस्तू विकल्या जातील असा इशारा देणारी रिक्षाही सर्वत्र फिरत आहे. पण मग ४०० कोटी रूपये जकात थकबाकी ठेवणा-यांच्या विरोधात कारवाई का केली जात नाही असा प्रश्न संजीव दत्ता यांनी उपस्थित केला आहे.