कोरोनाच्या संकटाचा लढा सुरु असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होण्यापूर्वी पाण्याचा टँकर गाव पाडे वस्त्यांवर पोहचायला हवा. शिवाय ठिकठिकाणी सुरु असणारी टंचाईची कामे जलद गतिने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले. आज त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून पाणी टंचाई कामांची आढावा बैठक घेतली. एप्रिल-मे महिन्याच्या तीव्र उन्हाळ्यात गावांमध्ये असणारे पाण्याचे विविध स्त्रोत आटल्याने पाणी टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे दरवर्षी टंचाई आराखडा मंजूर करून त्या माध्यमातून पाणी टंचाई कामे मार्गी लावली जातात. यंदा जरी कोरोनाचे संकट असले तरी जिल्हा परिषदेने योग्य खबरदारी घेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात टंचाई कामे सुरु केली आहेत. आजच्या घडीला शहापूर तालुक्यात ३७ गावं आणि ११९ पाड्यांवर ३१ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर मुरबाड मध्ये ४ गावं आणि १८ वाड्यांवर पाणी पुरवठा सुरु असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा एच. एल. भस्मे यांनी दिले. त्याच बरोबर भिवंडी तालुक्यात ८१ ठिकाणी विंधन विहिरींचे कामं सुरु झाली आहेत. यावेळी सोनवणे यांनी कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी, शहापूर या पाचही तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती जाणून घेतली.