यंदा पावसाचं आगमन लांबल्यानं पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्याची चिन्हं दिसत आहेत. वाढत्या उष्म्यामुळे एकीकडे भूजल पातळी घसरत असतानाच धरणातील पाण्याची पातळी देखील मोठ्या प्रमाणावर घटली आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या बारवी धरणात अवघा २१ टक्के पाणी साठा आहे. जिल्ह्यातील अनेक धरणांमधून मुंबईलाही पाणी पुरवठा केला जातो. यंदा पावसाचं आगमन लांबलं आहे. त्यामुळं मोठ्या पाणी टंचाईची भीती व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी बारवी धरणामध्ये ३५ टक्के पाण्याचा साठा होता तर यंदा तो अवघा २१ टक्के आहे. भातसा धरणात गेल्यावर्षी ३४ टक्के पाण्याचा साठा होता तर यंदा तो २७ टक्के आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या मोडकसागर धरणामध्ये ३५ तर तानसामध्ये अवघा ९ टक्के पाणी साठा आहे. बदलापूर बंधा-याची सध्याची पातळी ही १२.७० टक्के आहे यामुळं पाऊस लांबल्यास भीषण पाणी टंचाईची भीती दिसत आहे.