पहिल्याच पावसात नालेसफाईचं पितळ उघड – शहरामध्ये ५५ ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना

पहिल्या पावसातच ठाणे महापालिकेच्या नालेसफाईचं पितळ उघडं पडलं असून आज शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं दिसून आलं.ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला जोरदार पावसाने झोडपून काढले. पावसानं पहिल्याच दिवशी केलेल्या दमदार आगमनामुळे तब्बल ४७ ठिकाणी पाणी साचले होते. यामुळे रहिवासी आणि व्यापारी वर्गाचं नुकसान झालं. ठाण्यात राम मारूती रस्ता, गजानन महाराज मठ, वंदना सिनेमा, तीन पेट्रोल पंप, लोकमान्यनगर, वृंदावन, घाऊक बाजारपेठ, विटावा पूल अशा नेहमी पाणी साचणा-या भागांमध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचलं होतं. ठाण्यात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत असून सकाळी साडेआठ पर्यंतच्या २४ तासात ६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्यानं कालच जोरदार पावसाचा इशारा दिला होता. काही वेळ गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू होता. काही ठिकाणी चाळींमध्ये असलेल्या घरांमध्येही पाणी गेल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. अनेक ठिकाणी संरक्षक भिंत तसंच झाडे पडून वाहनांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. ठाण्यात पूर्व द्रूतगती मार्गावर सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. सकाळच्या म्हणजे ११.३० ते १२.३० या वेळात ६१ मिलीमीटर तर दुपारी साडेतीन पर्यंत एकूण ११६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर आत्तापर्यंत ४५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्यावर्षी आजपर्यंत ९० मिलीमीटर पाऊस झाला होता. या पावसामुळे ठाणे रेल्वे स्थानकातही पाणी साचलं होतं. यामुळं काही काळ रेल्वे सेवाही ठप्प झाली होती. ठाण्यात गेल्या १२ तासात १२३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर आत्तापर्यंत ४५९ मिलीमीटर पाऊस झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading