कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या आपला दवाखाना योजनेतील परिचारिकांना प्रशिक्षण देऊन पुन्हा सेवेत घेण्याबाबत आमदार संजय केळकर यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. यावर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. आपला दवाखाना योजनेत कोरोना काळात ६०हून अधिक परिचारिकांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र आता या कंत्राटी परिचारिकांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. कोरोना काळात गरीब रुग्णांना पर्यायाने आरोग्य यंत्रणेला या परिचारिकांमुळे मोठा आधार मिळाला होता. खासगी संस्थांमधून कोर्स करून प्रमाणपत्र मिळवणाऱ्या या परिचारिका त्यावेळी पात्र ठरल्या, मग आता अपात्र ठरवून त्यांना नोकरीवरून का काढून टाकण्यात आहे..? त्यांना प्रशिक्षण देऊन पुन्हा सेवेत घेणार आहात का..? असा प्रश्न केळकर लक्ष्यवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.आरोग्य यंत्रणेच्या विविध विभागात कोव्हिड काळात काम केलेले असे ८५० हून अधिक कर्मचारी असून त्यातील बहुतेक कर्मचाऱ्यांनी आ. केळकर यांची दोन दिवसांपूर्वी त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेतली होती. या कर्मचाऱ्यांना अवघ्या दोन – दोन महिन्यांच्या करारावर सेवेत घेतले जात आहे. परिचारिकांच्या धर्तीवर या कर्मचाऱ्यांना किमान ११ महिन्यांच्या करारावर सेवेत घेण्यात यावे, अशी मागणी केळकर यांनी केली. यावर उत्तर देताना उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शैक्षणिक अर्हतेत बसत नसल्याने या परिचारिकांना काढून टाकल्याचे सांगितले. मात्र केळकर यांच्या सूचनेनुसार या परिचारिकांना प्रशिक्षण देऊन पुन्हा सेवेत घेण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी सांगितले. तर आरोग्य यंत्रणेतील त्या कर्मचाऱ्यांबाबतही योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.