परदेश प्रवास करून जिल्ह्यात येणा-या नागरिकांनी १४ दिवस घरीच होम क्वारंटाईन करून घरामध्ये सुरक्षित रहावे तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं आहे. विमानतळावर कोरोनाग्रस्त देशांमधून येणा-या प्रवाशांची तीन प्रकारांमध्ये विभागणी करण्यात येत आहे. ए प्रकारात थेट लक्षणं दिसणं, बी मध्ये वयस्कर प्रवासी तर सी प्रकारामध्ये कुठलीही लक्षणं न दिसणारे प्रवासी आहेत. लक्षणं न दिसणा-या सी प्रकारातील प्रवाशांची प्राथमिक तपासणी करून त्यांना शिक्का मारून होम क्वारंटाईन करण्यास सांगितलं जात आहे. निवडणुकीच्या वेळी ज्याप्रमाणे मतदान केल्याची शाई लावली जाते त्याप्रमाणे हातावर शिक्का मारला जात आहे. हातावरील शिक्क्यावर होम क्वारंटाईन कधीपर्यंत करायचं आहे हेही नमूद करण्यात येत आहे. या मुदतीत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, कुठल्याही प्रकारची वैद्यकीय अडचण अथवा लक्षणं आढळल्यास प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, अशा नागरिकांची त्यांच्या घरी वैद्यकीय पथकामार्फत तपासणी केली जाणार आहे. अशा नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर टाळावा, सार्वजनिक समारंभ टाळावेत, बाहेरील व्यक्तींबरोबरच घरातील अन्य व्यक्तींनी दूर रहावं असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं आहे. होम क्वारंटाईनचा शिक्का असलेले नागरिक फिरताना दिसल्यास याची माहिती त्वरीत शासकीय यंत्रणेला कळवावी असं आवाहनही जिल्हाधिका-यांनी केलं आहे.