पंडीत राम मराठे स्मृती महोत्सवाला मिळत असलेल्या कमी प्रतिसादामुळे महोत्सवाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पंडीत राम मराठे स्मृती महोत्सवाचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं. मात्र यंदा या महोत्सवाला प्रेक्षकांचा फारच कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आयोजक आणि पालिकेच्या पदाधिका-यांकडून समारोपाच्या कार्यक्रमात चिंता व्यक्त करण्यात आली. एकेकाळी पंडीत राम मराठे स्मृती महोत्सवाची तारीख जाहीर झाल्यानंतर तिकिट विक्रीच्या दिवशी पहाटेपासून रांगा लागत असत. मात्र अलिकडे या महोत्सवाला प्रेक्षक मिळेनासे झाले आहेत. यंदा तर प्रेक्षकांनी जवळपास पाठ फिरवल्याचंच दिसून आलं. पंडीत राम मराठे स्मृती महोत्सव हा सुरूवातीला तीन दिवसच होता. मात्र महापौर संजय मोरे यांच्या काळात या महोत्सवाच्या दिवसांमध्ये वाढ करण्यात आली. सुरूवातीला या महोत्सवासाठी तिकिट होतं. मात्र नंतर महापालिकेनं तो विनामूल्य केला. त्यानंतरच प्रेक्षकांची गळती सुरू झाली. त्यामुळं या महोत्सवाला पुन्हा तिकिट सुरू करावं का असा विचारच सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी समारोप कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. प्रसिध्द आणि गुणी कलाकारांची सांगड घालून हा महोत्सव आयोजित करावा तसंच कानसेन तयार करण्यासाठी कार्यशाळा आयोजित कराव्या अशी सूचनाही पंडीत उल्हास कशाळकर यांनी समारोप कार्यक्रमात बोलताना केली.