मराठी उद्योजक भेटला की आनंद होतो आणि आपण त्याला आनंदाने भेटतो. केवळ नोकरी शोधणारा मराठी तरुण न राहता नोकरी देणारा मराठी तरुण घडविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केले. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केलं. स्वर्गीय माधवराव भिडे यांनी मराठी उद्योजकांना जोडण्याचे काम केले. विकासामध्ये औद्योगिकरणाचे महत्त्व सर्वाधिक असते आणि ज्या देशात औद्योगिकरण जास्त होते, तो देश जगातील बलवान देश असतो. महाराष्ट्र औद्योगिकरणामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. देशातील 10 मोठ्या उद्योगपतींपैकी 7 उद्योगपती हे महाराष्ट्रातील आहेत, याचा आपण अभिमान ठेवला पाहिजे. मराठी माणूस उद्योजक व्हावा म्हणून जे करावे लागेल ते सर्व प्रयत्न करण्यात येतील. सकात्मक सरकार सत्तेमध्ये आहे, त्यामुळे उद्योजकांच्या अडचणींवर मार्ग काढले जातात. भारत हा तरुणांचा देश आहे. उद्योजकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुतवणूक केली पाहिजे. जीएसटीबद्दलच्या उद्योजकांच्या मागणीवर मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य तो मार्ग काढण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.