नाले साफ करण्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्याऐवजी शहराच्या उताराचा योग्य वापर केल्यास नालेसफाईसाठी होणा-या कोट्यावधी रूपयांच्या खर्चाला आवर घालता येईल अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. पावसाळा येण्यापूर्वी दरवर्षी नालेसफाई केली जाते. या नालेसफाईवर कोट्यावधी रूपयांचा खर्च होतो. मात्र हा खर्च करूनही शहरामध्ये अनेक ठिकाणी ठाणेकरांच्या घरात पाणी शिरते. त्यामुळे नालेसफाईवर होणारा कोट्यावधी रूपयांचा खर्च वाया जातो. यासाठी येऊर पासून शहराला असणा-या उताराचा वापर योग्य त-हेने केल्यास आणि खाडीच्या ठिकाणी असलेली नाल्याची तोंडं उघडल्यास नालेसफाईवरचा खर्चही वाचू शकतो. नाले कितीही मोठे केले, खोल केले पण नाल्याची तोंडं जर बंद राहिली तर शहरात पाणी साचणं नित्याची बाब होते. यासाठी खाडीत असलेली नाल्याची तोंडं स्वच्छ आणि रूंद केल्यास पाण्याचा निचरा योग्यत-हेने होऊन पाणीही तुंबणार नाही अशी अपेक्षा राजीव दत्ता यांनी व्यक्त केली आहे.