ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील पाणी बिलाच्या वसुलीकरीता मोठ्या प्रमाणावर मोहिम राबविण्यांत येत असून, नागरिकांनी मागील थकबाकीसह चालू वर्षाच्या पाणी बिलाची रक्कम मार्च अखेरपर्यंत भरणा करुन कठोर कारवाई टाळावी असे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे. या वसुली मोहिमेंतर्गत आजपर्यंत एकूण ४०१० नळ संयोजन खंडीत करण्यात आलेली असून २५० मोटार जप्त आणि २०० पंप रुम सील करण्यात आले आहेत. या वसुली मोहिमेंतर्गत नळ संयोजन खंडीत करुन, पाणीपुरवठा बंद करणे, जप्तीची कारवाई करणे, पंप रुम सिल करणे, पंप् जप्तीची कारवाई करणे इत्यादी प्रकारच्या कारवाई करण्यात येत असून आजपर्यंत एकूण ४०१० नळ संयोजन खंडीत करण्यांत आलेली आहेत, तसेच २५० मोटार जप्ती, २०० पंप रुम सील करण्यांत आले आहेत. महापालिकेच्यावतीने पाणी बिलाच्या वसुलीची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून मार्च अखेरपर्यंत पाणी बिलाची रक्कम महापालिकेकडे जमा न करणाऱ्या नळ संयोजनधारक ग्राहकांवर कठोर कारवाई सुरुच राहणार आहे. नळ कनेक्शन खंडीत केल्यानंतर रक्कम न भरणा करता, परस्पर जोडून घेणाऱ्या ग्राहकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून नळ संयोजन कायम स्वरुपी बंद करणे, मालमत्ता जप्ती करणे, सील करणे अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी त्यांची पाणी बिलांची देयके तातडीने भरून महापालिकेस सहकार्य करावे आणि कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.