वाहन चालकांना आजपासून त्यांच्या नवीन वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी पट्टी लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. उच्च सुरक्षा नोंदणी पट्टी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. या पट्ट्या उत्पादक आणि वितरकांमार्फत बसवल्या जाणार आहेत. या पट्ट्यांमुळे वाहनांची सुरक्षा उपाययोजना अधिक काटेकोर होणार आहे. आजपासून उत्पादित होणा-या सर्व वाहनांना अशा नंबरप्लेटस् बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळं आजपासून नोंदणी केलेल्या सर्व वाहनांना अशा नंबरप्लेट असल्याची खात्री करूनच त्यांची नोंदणी केली जाणार असल्याचं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत ससाणे यांनी सांगितलं आहे. या सिक्युरिटी नंबरप्लेट स्नॅप लॉकद्वारे एकदा वाहनावर लावल्यानंतर त्यांचा उपयोग अन्य कोणत्याही वाहनांवर करता येणार नाही. कोणत्याही कारणाने या नंबरप्लेट पुसट झाल्यास वाहन नोंदणीच्या तारखेपासून १५ वर्षापर्यंत त्या विनामूल्य बदलून दिल्या जाणार आहेत.