धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी समूह विकास योजना तयार करण्याचे नगरविकास मंत्र्यांचे सर्व महापालिकांना आदेश

मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकांनी समूह विकास आराखडा तयार करावा असे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व महापालिकांना दिले आहेत. धोकादायक इमारतींच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडण्यामागे मालक-भाडेकरू यांच्यामधील वाद हे कारण असल्याचं सर्व महापालिका आयुक्तांनी सांगितलं. त्यावर प्रत्येक महापालिकेनं आपल्या क्षेत्रात समूह विकास योजना राबवण्याचे आदेश नगरविकास मंत्र्यांनी दिले. ज्या इमारतींचा समूह विकास योजनेमध्ये समावेश होऊ शकत नाही अशा इमारतींच्या पुनर्विकासासाठी काय उपाययोजना करता येतील यावर उपाय सुचवण्याचे आदेशही नगरविकास मंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिले. धोकादायक इमारतींमधून राहणा-या नागरिकांच्या तात्पुरत्या निवा-यासाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात संक्रमण शिबिरं उभारावीत अशी सूचनाही एकनाथ शिंदे यांनी केली. प्रत्येक महापालिकेनं एनडीआरएफच्या धर्तीवर स्वत:चं पथक निर्माण करावं. म्हणजे एखादी दुर्घटना घडल्यास जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचवणं सोपं होईल असंही नगरविकास मंत्र्यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading