दिवा भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी उद्यापासून अतिरिक्त सहा एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याच्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जलसंपदा विभागाने आज त्यावर तात्काळ कार्यवाही केली. त्यामुळे उद्यापासून दिवा भागासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कल्याण डोंबिवली आणि २७ गावांच्या पाणी प्रश्नाबाबत उद्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी दौरा करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. दिवा भागातील पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. दिवा भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता १० एमएलडी पाणी वाढवून मिळावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार साडे तीन एमएलडी पाणी उपलब्ध झाले असून एमआयडीसीने उर्वरित साडे सहा एमएलडी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली. त्यानुसार ठाणे महापालिकेने अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याबाबत जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे यावेळी निर्देश देण्यात आले.
कल्याण डोंबिवली सह २७ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. त्यासाठी श्रीकांतशिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी ठाणे, कल्याण डोंबविली महापालिकेचे अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनी उद्या मंगळवारी संयुक्त पाहणी करून अतिरिक्त पाणी पुरवठ्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.