ठाणे महापालिकेच्या वतीनं डायघर तसंच परिसरातील गावांकरिता तयार करण्यात आलेल्या एकात्मिक विकास प्रकल्पांतर्गातील विविध कामांना काल सुरूवात करण्यात आली. ठाणे महापालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणारा बहुतांश भाग हा ग्रामीण स्वरूपाचा आहे. या भागाची भौगोलिक परिस्थिती विचारात घेता या परिसराच्या विकास कामांसाठी सूक्ष्म नियोजनाची गरज होती. यासंदर्भात स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक तसंच नागरिकांनी वेळोवेळी सूचना केल्या होत्या. त्यानुसार पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली डायघर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरवण्याच्या दृष्टीनं एक विशेष एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यांतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. दिवा प्रभाग समितीमधील डायघर रस्त्याचे पुनर्बांधणी आणि पुनर्पृष्ठीकरण करणं, डायघर आणि खिडकाळी येथील स्मशानभूमीची सुधारणा आणि आधुनिकीकरण अशा कामांचा शुभारंभ करण्यात आला.