ठाण्यामध्ये गेल्या १० दिवसापासून कोरोनाचं प्रमाण कमी झालं असलं तरी सावधगिरी बाळगण्याची गरज महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी व्यक्त केली आहे. गेले काही दिवस ठाण्यातील कोरोनाच्या नवीन रूग्णांच्या प्रमाणात घट झाल्याचं दिसत आहे. ठाण्यातील डबलिंगचा रेट २०० दिवसांवर गेला असून पॉझिटिव्हचं प्रमाणही साडेनऊ टक्क्यांवर आलं असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं. मात्र असं असलं तरी येणा-या सणांच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याची गरजही महापालिका आयुक्तांनी व्यक्त केली आहे. महापालिकेची कोरोना रूग्णालयं ही इतक्यातच बंद केली जाणार नसल्याचंही महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं. कोरोनाची साथ दुस-यांदा येण्याची शक्यता पाहता इतक्यातच कोरोनाची रूग्णालयं बंद केली जाणार नसल्याचंही पालिका आयुक्तांनी सांगितलं. आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य ठाणेकरांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहनही पालिका आयुक्तांनी केलं आहे. शासनानं घालून दिलेले निकष या काळात पाळण्याची आवश्यकता आहे. कोरोनाबाबतचे निकष हे आपल्या जीवनशैलीचा भाग करण्याची गरजही महापालिका आयुक्तांनी व्यक्त केली. दिवाळी ही पर्यावरण पूरक साजरी करावी, महापालिकेनं गेल्या काही वर्षापासून यासाठी पावलं उचलली आहेत. ठाणेकरांनीही पर्यावरणपूरकच सण साजरे करून त्याला हातभार लावावा असं आवाहनही महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी केलं आहे.