आज पासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून १६ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी बसणा-या शालेय विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवास करण्यास रेल्वेने रोखले आहे. ही बाब खासदार राजन विचारे यांच्या आज निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी मुख्यमंत्री आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्याची मागणी केली आहे. दहावी-बारावीच्या काही विद्यार्थ्यांनी कोरोना लस अद्याप घेतली नाही काहींची एकच लस झालेली आहे असून दुसरी अजून बाकी आहे. त्यामुळे सुरू झालेल्या परीक्षेसाठी ये-जा करण्यासाठी त्यांच्या राहत्या घरापासून दूर असलेल्या शाळेसाठी रेल्वे प्रवास करता येत नसल्याने खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे, वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी शाळेत वेळेत पोहोचू शकत नाहीत. यासाठी विचारे यांनी त्यांना रेल्वेने तसेच टी एम टी किंवा बी एस टी बस मधून प्रवास करण्याची मुभा देण्यासाठी राज्य शासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पत्रव्यवहार करून तात्काळ केलेल्या मागणीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची विनंती त्यांनी केली आहे. तसेच हा नियम राज्यातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात यावा. जेणे करून कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे.