तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर केंदीय पथकाने ठाणे शहरात येऊन पालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनेचा आढावा घेतला. यावेळी या पथकाने अनेक भागात भेटी दिल्या तसेच दुसऱ्या लाटेत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती परत करू नका, योग्य नियोजन करा अशा सूचना पालिका प्रशासनाला केल्या आहेत. ठाणे जिल्हा तिसऱ्या स्तरात मोडत असून विविध महापलिकेमध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र एकीकडे या नियमाचे पालन होताना दिसत नसून दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण कमी होत नाहीत. त्यामुळे शहरात कश्या पध्दतीने काम सुरू आहे ? काय उपाययोजना राबविण्यात येत आहे ? याचा आढावा केंदीय पथकाने घेतला आहे. सकाळपासून या पथकाने बैठका, पाहणी करून शहराची परिस्थिती लक्षात घेतली. कोरोना नियंत्रणासाठी अनेक प्रयत्न होत असताना नागरिकांकडून नियमाचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. मास्क हे करोना टाळण्यासाठीचे सर्वोत्तम औषध आहे. दक्षता त्रिसूत्रीबाबत वारंवार सूचना देत राहाव्यात अशी सूचना यावेळी या पथकाने केली. या पथकाने पार्किंग प्लाझा, ऑक्सिजन प्लांट, लसीकरण केंद्र तसेच वॉर रूम ची पाहणी केली. त्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांशी शहराच्या परिस्थितीत बाबत चर्चा केली. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांनी टीमवर्क ठेवावे असे निर्देश पथकाने दिले असून पालिकेने केलेल्या उपयोजनेचे कौतुक केले.