खारेगांव पूलावरून सुरू असलेली श्रेयवादाची लढाई आमच्या दृष्टीनं आम्ही थांबवली आहे. मात्र या विषयावर टीका टिप्पणी होत राहिल्यास आघाडी करणं अवघड आहे असं वैयक्तीक मत महापौर नरेश म्हस्के यांनी आज व्यक्त केलं. खारेगांव पूलाच्या उद्घाटनावरून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादविवाद चव्हाट्यावर आले. दोघांनी एकमेकांविरोधात टीका टिप्पणी केली. आज सकाळीही आनंद परांजपे यांनी यावर टीप्पणी केल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत महापौर नरेश म्हस्के यांनी हे मत व्यक्त केलं. आमचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणेच आम्ही काम करू, पण आपलं वैयक्तीक मत मात्र अशी टीका टिप्पणी चालू राहिल्यास आघाडी करू नये असंच आहे. ठाणे महापालिकेच्या शिवसेना नगरसेवकांचंही असंच मत असल्याचंही महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं. गेले दोन दिवस वादविवाद, क्रिया-प्रतिक्रिया सुरू असून आपल्या दृष्टीनं आपण आता हे सर्व थांबवत आहोत. खारेगाव पूलाचं उद्घाटन झालं असून हा पूल आता जनतेच्या सेवेत आला आहे. त्यामुळे आता आपण तरी यावर काहीही बोलणार नाही असंही महापौरांनी यावेळी स्पष्ट केलं.