कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता यंदाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती शासनाच्या नियमावलींचे पालन करून घरातूनच अभिवादन करत साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव भारतीयांसाठी मोठा उत्साहाचा आणि आनंदाचा क्षण आहे. संपूर्ण देशभर विविध स्तरातून महामानवास अभिवादनवर मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन, मिरवणुका मोठ्या उत्साहात काढल्या जातात. ठाणे महापालिकेच्या वतीनेही दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते, परंतु यंदा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार नाही. सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढत असून दिवसागणिक रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे यंदाची जयंती गर्दी न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करत अत्यंत साधेपणाने घरातूनच अभिवादन करत साजरी करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.