ठाणे, पुणे आणि अन्य महापालिकांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आल्यानं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुध्दे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे तक्रार केली असून लॉकडाऊन वाढवण्यात आल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. लॉकडाऊनमुळे सामान्य माणसाचे तर फारच हाल होत असल्याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन सुरू केले मात्र ठाणे आणि इतर काही महापालिकांमध्ये मात्र लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानं व्यापारी आणि नागरिक चिंतेत आहेत. अनेकांना नोक-याही गमवाव्या लागल्या असून आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या अशा धरसोड वृत्तीमुळे आर्थिक नुकसान होत असून केंद्रानं याबाबत कारवाई करावी अशी मागणीही सहस्रबुध्दे यांनी केली आहे. व्यापारी, लघुउद्योजक, नागरिक सर्वच संभ्रमात असून प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सहा फॉर्म्युल्यावर काम करावे अशी सूचना विनय सहस्रबुध्दे यांनी या निवेदनात केली आहे. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे, मास्कची सक्ती करावी, वारंवार चुका करणा-यांवर कारवाई करावी, हँड सॅनिटायझर अनिवार्य असावा, सार्वजनिक आणि खासगी वाहनांमधील प्रवासासाठी नियम निश्चित करावेत, ठराविक कालावधीसाठी सर्व दुकानं उघडण्याची परवानगी द्यावी, सार्वजनिक बगिचे, मंदिरं, खुली व्यायामशाळा वापरण्यास परवानगी द्यावी अशा सूचना विनय सहस्रबुध्दे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केल्या आहेत.