लॉकडाऊनच्या काळात किमान ४ तास तरी दुकानं उघडण्यास परवानगी देण्याची घाऊक व्यापा-यांची मागणी

ठाण्यातील घाऊक व्यापा-यांनी लॉकडाऊनच्या काळात किमान ४ तास तरी दुकानं उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. ठाणे व्यापारी मंडळ या जांभळी नाका होलसेल मार्केटमधील व्यापा-यांनी महापालिकेकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे घाऊक व्यापाऱ्यांसमोर जीवनावश्यक वस्तु आणि मालाच्या साठवणुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ठाण्यात २ जुलैपासून लॉकडाऊन सुरू असून आता ते १९ जुलैपर्यत वाढवण्यात आल्याने ठाणे होलसेल मार्केटमधील घाऊक किराणा व्यापाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसात दुकानं जास्त दिवस बंद राहिल्याने धान्याला कीड लागून मालाची नासाडी होण्यास सुरूवात झाली आहे. तसंच जीवनावश्यक वस्तूंना बुरशी येत असल्याचं आढळून आलं आहे. घाऊक बाजारात व्यापा-यांकडे २५ ते ३० लाखाहून अधिक मालाचा साठा असल्यानं टाळेबंदीमुळे व्यापाऱ्यांना नाहक नुकसान सोसावे लागेल. परिणामी आधीच मंदीचा सामना करावा लागत असून व्यापारी वर्गाच्या अडचणी वाढल्या आहेत. तेव्हा या लॉकडाऊन काळात जांभळी नाका, होलसेल मार्केटमधील २५ घाऊक व्यापाऱ्यांना किमान ४ तास दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी व्यापा-यांनी केली आहे. तसंच प्रशासनाने काही कालावधीसाठी दुकाने उघडण्याची परवानगी दिल्यास महापालिकेनं आखुन दिलेल्या कोवीड-19 नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जाईल. त्याचबरोबर ग्राहकांची गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग पाळण्याची हमी देत असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading