जिल्ह्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. संतोषी माता महिला बचत गट यशोधननगर आणि लक्ष्मी कॅटरर्स लोकमान्यनगर येथे शिवभोजन योजनेचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य शासनानं जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत येणा-या भोजनालयात दोन पोळ्या, १ वाटी भाजी, १ वाटी वरण, १ मूद भात असलेली थाळी १० रूपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात ७ ठिकाणी शिवभोजन केंद्राचा प्रारंभ झाला आहे. गरीब, गरजू जनतेला सवलतीच्या दरात फक्त १० रूपयात भोजन उपलब्ध करून देण्यात आलं आहे. शिवभोजन योजनेसाठी ॲपचीही निर्मिती करण्यात आली आहे. शिवभोजन करणा-या व्यक्तीचे छायाचित्र ॲपद्वारे काढण्यात येणार असल्यामुळं या योजनेत पारदर्शकता येणार आहे. शिवभोजन थाळीमध्ये दुपारी १२ ते २ या कालावधीत थाळी देणं अनिवार्य आहे. शासकीय कर्मचारी तसंच कोणत्याही आस्थापनेवरील कर्मचा-यांना भोजनालयात सवलतीच्या दराने जेवण्यास सक्त मनाई असेल. प्रत्येक भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणीही करण्यात येणार आहे.