जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते, उद्योग आणि सिंचन सुविधांचा विकास करण्याबरोबर जिल्हा पर्यटन हब म्हणून विकसित करण्यास जिल्हा प्रशासनाचे प्राधान्य असेल असं पालकमंत्र्यांनी सांगितलं. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील सर्व घटकांचा विकास होण्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. विकासाचा वेग अधिक गतिमान करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी प्रभावी कामगिरी करायला हवी असं त्यांनी सांगितलं. विजेचा प्रश्न सौर उर्जेच्या माध्यमातून कसा सोडवता येईल यासाठी नियोजन सुरू आहे. शेतकरी सक्षम होण्यासाठी विविध उपाययोजना आगामी काळात राबवण्यात येणार आहेत. ध्वजारोहणानंतर शानदार संचलन झालं. या संचलनात शहर पोलीस, राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक १०, वाहतूक शाखेसह राष्ट्रीय छात्रसेना, सैनिकी स्कूल आणि स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी मेजर प्रांजल जाधव, हरिश वायदंडे, माधुरी तरमाळे, भरत तावरे, कृष्णा भोसले, नरेंद्र मोटे, संजय पवार, मनोज परदेशी, संदीप मोरे, विलास ढमाले यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दल गौरवण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.