ठाण्यामध्ये वर्षाअखेरीस दोन दिवस नाकाबंदी

ठाण्यामध्ये वर्षअखेरीस दोन दिवस नाकाबंदी लावण्यात आली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्याकरिता आणि नववर्षाचं स्वागत करण्याकरिता विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्र येतो. यावेळी खबरदारी आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी रस्त्यांवर नाकाबंदी असणार आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, वागळे अशा विविध परिमंडळात यासाठी ५०० पोलीस अधिकारी, ३ हजार पोलीस अंमलदार तसंच वाहतूक शाखेकडून विविध महत्वाच्या चौकात ४२ पोलीस अधिकारी, ४०० पोलीस अंमलदार, विशेष शाखेकडून नागरी वेशात ७० अधिकारी आणि अंमलदार असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयातील महत्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी हॉटेल्स, लॉजेस, ढाबे, लॉन्स या परिसरात नागरी वेशातील विशेष तपासणी पथकं तैनात करण्यात आली असून या ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. महिला छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी निर्भया पथकं तैनात करण्यात आली आहेत. नववर्ष स्वागतादरम्यान काही संशयित हालचाली आणि संशयित वस्तू दिसल्यास तात्काळ स्थानिक अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणा-या हुल्लडबाजांवर कारवाई करण्याकरिता भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. मद्यपान करून वाहन चालवणा-यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. कोरोनाचा धोका पुन्हा दिसत असल्यामुळं सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याचं आवाहनही पोलीसांनी केलं आहे. नववर्षाचं स्वागत शांततेनं करावं असं आवाहन करताना पोलीस आयुक्तांनी ठाणेकरांना नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading