ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जागतिक गद्दार दिन पाळण्यात आला. या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन केलं. आजच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत सरकार स्थापन केलं होतं. त्याला एक वर्ष झाल्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलं. ठाण्यामध्येही ५० खोके एकदम ओके, ५० खोके माजले बोके, चले जाव चले जाव गद्दार गुवाहटी चले जाव अशा घोषणा देत खोक्यांची होळी करण्यात आली. या आंदोलनानंतर पोलिसांनी आनंद परांजपे यांना अटक करून सोडून दिले. दरम्यान याप्रसंगी जितेंद्र आव्हाड यांनी गद्दारांची तुलना सूर्याजी पिसाळ यांच्याशी केली. वर्षभरापूर्वी सुर्याजी पिसाळांच्या औलादींनी महाराष्ट्राशी गद्दारी केली होती. त्याचा निषेध म्हणून आजचे आंदोलन करण्यात आले. पन्नास खोक्यात स्वतःला विकणाऱ्यांचे चारीत्र्य काय असेल हे सांगायलाच नको. पण, हे पन्नास खोके किती पुरणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना मतपेटीतून धडा शिकवणारच आहे. शिंदे सरकार आणि भाजपचा गाशा 100 जागांच्या आतच गुंडाळावा लागणार आहे. कारण, गेल्या वर्षभरात महिलांना मारहाण करण्याची संस्कृती महाराष्ट्रात वाढीस लागली आहे. रोशनी शिंदे आणि अयोध्या पौळ ही ती उदाहरणे आहेत. अयोध्या पौळला मारणाऱ्या महिला या जयभीम नगरमधील नव्हत्या. गेले वर्षभर दादागिरी करणे, खोट्या केसेस टाकणे असेच प्रकार या लोकांनी केले आहेत. त्यावरून पन्नास खोक्यावाले मनातून किती क्रूर आहेत, हे स्पष्ट झाले आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.