ठाण्यामध्ये येत्या शनिवारी उपवन तलावाजवळ सामुहिक अग्निहोत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाणे डिस्ट्रीक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन, विश्व फौंडेशन अक्कलकोट आणि सोलापूर सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं या सामुहिक अग्निहोत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. एका पत्रकार परिषदेत ठाणे डिस्ट्रीक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनच्या सिताराम राणे यांनी ही माहिती दिली. अग्निहोत्र हे कर्मकांड नसून यामुळं पर्यावरणाला फायदा होतो. अग्निहोत्रामुळे उत्तम आरोग्य, ताणतणाव कमी होणं, निर्जंतुक वातावरण, सकारात्मक दृष्टीकोन, पर्यावरण संतुलन आणि मुलांवर चांगले संस्कार होतात असं सांगितलं जातं. सामुहिक अग्निहोत्राच्या वेळेस पर्यावरणाला कसा आणि किती फायदा होतो याची प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे मोजणी केली जाणार असल्याचंही सिताराम राणे यांनी सांगितलं. या सामुहिक अग्निहोत्रास १० हजार लोकं येतील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. साडेचार हजार लोकांनी नोंदणी केली असून नोंदणी न केलेल्या लोकांनाही या सामुहिक अग्निहोत्रात सहभागी होता येणार आहे. अग्निहोत्र करण्यासाठी अग्निहोत्राचं पात्र आणि साहित्य सर्वांना विनामूल्य दिलं जाणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर या सामुहिक अग्निहोत्रात सहभागी होणार असल्याचं सिताराम राणे यांनी सांगितलं.