आवास दिनाचं औचित्य साधत केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या जिल्हा परिषद
अधिकारी-कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी
करणा-या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत
जिल्ह्यानं अव्वल कामगिरी केली. ही योजना ग्रामीण विकास योजनेअंतर्गत राबवली जाते. या योजनेत कल्याण, अंबरनाथ,
शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. या तालुक्यांचे गटविकास अधिकारी तसंच जिल्हा आणि
तालुकास्तरीय घरकुल कक्षात काम करणा-या अधिकारी-कर्मचा-यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं.
त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातील केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेचं उद्दिष्ट साध्य करणा-या पहिल्या ५
ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणा-या जिल्हास्तरीय
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्काराचं वितरण करण्यात आलं.