ठाण्यात १६ मे रोजी शून्य सावली योग

मुंबई आणि ठाण्यात येत्या १६ मे रोजी शून्य सावली योग पहायला मिळणार आहे. अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. वर्षातून दोन वेळा काही क्षणासाठी आपली सावली आपल्याबरोबर नसते. खगोलीय विश्वात या शून्य सावली योग असं म्हटलं जातं. वर्षातील दोन दिवस आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एक होते. त्यादिवशी भर दुपारी सूर्य आकाशात बरोबर आपल्या डोक्यावर आल्यावर आपली सावली पायाजवळ आल्यानं दिसू शकत नाही. त्यामुळं ठराविक दिवशीच हा अनुभव घेता येतो असंही सोमण यांनी सांगितलं. शून्य सावलीचा हा अनुभव उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकर वृत्त यामधील प्रदेशातूनच घेता येऊ शकतो. मे महिन्यात आकाश निरभ्र असल्याने शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. दुसरा दिवस साधारणपणे पावसाळ्यात येत असल्यानं तेव्हा आपल्याला हा अनुभव घेता येत नाही. राज्यात ११ ते २५ मे दरम्यान विविध ठिकाणी हा अनुभव घेता येईल. मुंबई-ठाण्यात १६ मे रोजी तर कल्याण-डोंबिवलीमध्ये १७ मे रोजी शून्य सावली योग अनुभवायला मिळेल असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. ठाण्यात १२ वाजून ३५ मिनिटांनी सूर्य आकाशात डोक्यावर येईल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading