ठाणे महापालिकेच्या लसीकरण मोहीमेत राजकारण सुरू असून पक्षपातीपणा केला जात असून महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाकडून विशिष्ट पक्षांनाच लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात आहे. देशाची लस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची उठबस अशी स्थिती असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केला. आज एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सेवा सप्ताहात लसीकरण शिबिर घेण्यात येणार होते. मात्र त्याला महापालिकेने नकार दिला. देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळावी यासाठी वेगाने लसीकरण सुरू आहे. मात्र गेल्या एक-दीड महिन्यांपासून ठाण्यात राजकीय दबावापोटी महापालिका प्रशासनाकडून लसीकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वाव दिला जात आहे. लस एका पक्षाची नाही, महाविकास आघाडीची तर बिल्कूल नाही. ती केंद्र सरकारची आहे. मात्र, ठाण्यात राजकीय पक्षबाजी सुरू आहे. एखाद्या आपत्तीत नागरीकांच्या तोंडचा घास काढून घेणे, हे महाभयानक पाप आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षबाजीमुळे सामान्य नागरीक लसीपासून वंचित ठेवणे, हेही पाप आहे. हाच प्रकार महापालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून घडत आहे. महापालिका प्रशासनाने राजकीय दबावाला बळी पडून लसीकरण मोहीम राबवू नये. अन्यथा गंभीर परिणाम होतील असा इशाराही विनय सहस्रबुद्धे यांनी दिला.