मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला खारेगाव आणि साकेत पुलाच्या दुरुस्तीचे काम कालपासून सुरु झालं आहे. या दुरुस्तीच्या पहिल्या दिवशीच वाहतुकीवर परिणाम जाणवलेला दिसतो. साकेत पूल ते पूर्व दृतगती महामार्गावरील नितीन कंपनी घोडबंदर येथील तत्त्वज्ञान विद्यापीठ आणि खारेगाव ते भिवंडीतील मानकोली नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना सुमारे एक तास लागत होता या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांचे हाल झाले. दुपारी तापमान वाढले असल्याने दुचाकी चालकांना उन्हाचा कडाका सहन करावा लागला. मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत आणि खारेगाव हे पूल अत्यंत रुंद आहेत. पावसाळ्यात या पुलावर खड्डे पडल्यास त्याचा परिणाम ठाणे आणि भिवंडी शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळास दोन्ही पुलांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. ही दुरुस्ती १० एप्रिल पासून केली जाणार होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे तसेच खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमामुळे ही दुरुस्ती पुढे ढकलण्यात आली होती. अखेर बुधवारपासून या दुरुस्तीस सुरुवात करण्यात आली आहे. साकेत आणि खारेगाव पुल हे चार पदरी आहेत. यातील एक पदरी मार्गिका बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच रुंद असलेल्या या पुलाच्या केवळ तीन पदरी मार्गिका वाहन चालकांसाठी उपलब्ध आहेत.