जिजामाता फळबाजी सेवा संघ आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान भाजी विक्रेता सेवा संघ यांनी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर बेमुदत बंद मागे घेतल्यामुळे जांभळी नाका येथील भाजी मंडई पुन्हा सुरू झाली आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी मंडई आणि फेरीवाले यांच्यातील वादावर तोडगा काढत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांमुळे होणारी उपासमार आणि प्रशासनाची भूमिका या विरुद्ध आक्रमक भूमिका घेत भाजी मंडईतील दोन्ही संघटनांनी बेमुदत बंद पुकारला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि लहान विक्रेते यांना गेले तीन दिवस झळ बसली. बुधवारी या भाजीमंडईतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संजय केळकर यांनी अतिक्रमण उपायुक्त गोदेपुरे आणि परिमंडळ उपायुक्त पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त एडके यांच्याशी चर्चा करून उद्धभवलेल्या संघर्षावर दोन्ही बाजूने सारासार विचार करून या विरुध्द मार्ग काढण्याच्या सूचना केल्या. तर संघटनांनीही अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई हाती घेणार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. परवानेधारक फेरीवाले अनधिकृत फेरीवाले यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यानुसार कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आलं. आता तूर्त बंद मागे घेतल्याने जांभळी नाक्यावरील भाजी मार्केट पुन्हा सुरू झालं असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.