ठाण्यातील रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव आणि इतर पदाधिका-यांनी आयुक्तांना एक निवेदन देऊन त्याद्वारे ही मागणी केली आहे. ठाणे शहराचा विस्तार घोडबंदर रस्त्यावर मोठ्या झपाट्याने होत आहे. नागरी वस्ती वाढीसोबत गुन्हेगारी कृत्ये देखील वाढत चालली आहेत. या मार्गावर तसेच अंतर्गत मार्गांवर देखील सी.सी टी.व्ही ची नितांत गरज आहे. निवासी संकुलांमध्ये घुसून सोनसाखळी, मोबाईल चोरीचे प्रकार वाढत आहेत. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पुरेसे सी.सी टी.व्ही. बसवलेले नसल्यामुळे अश्या घटनांमधील गुन्हेगारांचा शोध घेणे अशक्य होते. प्रभावी गुन्हे तपास करण्यासाठी आधुनिक सी.सी टी.व्ही. कॅमेरांची गरज आहे. त्यामुळे या विषयाची गंभीर दखल घेऊन पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेऊन सी.सी.टी. व्ही. चे जाळे वाढवावे अशी विनंती करण्यात आली आहे.