ठाण्यातील बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी अशा समूह विकास योजनेचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून हा प्रकल्प राबवण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. किसननगर, कोपरी, राबोडी, हजुरी, टेकडी बंगला आणि लोकमान्यनगर या ६ ठिकाणी समूह विकास योजना राबवली जाणार आहे. त्यापैकी प्रातिनिधीक म्हणून किसननगर समूह विकास योजनेतील किसननगर, जयभवानी नगर येथील पहिल्या योजनेचं भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं. एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्यातील विविध लोकप्रतिनिधींनी समूह विकास योजना लागू करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. आंदोलनं, मोर्चे, विधीमंडळात उपस्थित केलेले प्रश्न अशा विविध माध्यमांतून सरकारवर दबाव निर्माण करण्यात आला होता. या विविध प्रयत्नांमुळे समूह विकास योजनेला मंजुरी मिळाली. ठाणे महापालिकेनं समूह विकास योजनेतील ४४ आराखड्यांपैकी ६ आराखड्यांना मंजुरी दिली आहे. या ६ आराखड्यांमध्ये १ लाख ७ हजार बांधकामं असून ४ लाख ८५ हजार लाभार्थी आहेत. या योजनेचं उद्घाटन झाल्यामुळं आता ठाण्यात धोकादायक, अनधिकृत इमारतींमधून राहणा-या रहिवाशांना हक्काचं घर मिळणार आहे.