ठाणे महापालिका क्षेत्रात कोविडचा प्रसार सध्या वेगाने होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाले असून याकडे पंतप्रधानांनी लक्ष घालावं अशी मागणी धर्मराज्य पक्षाने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून धर्मराज्य पक्षानं ही मागणी केली आहे. ठाण्यात सध्या कोविड या आजाराने थैमान घातलं असून मानपाडा विभागातील रुग्णास तीन चार खाजगी हाँस्पिटल फिरूनही अॅडमिट करून घेतले नाही म्हणून रिक्षातच त्याचे निधन झाले. यामुळे सामान्य नागरिक धास्तावले आहेत. रुग्णांची औषधे आणि मेडिकलची बीलं ही अनेक लाख रूपयात पहाता नागरिकांचा धीर सुटत चालला आहे. ठाणे महापालिकेने बाळकुम येथे सुमारे १२०० बेडचे हॉस्पिटल उभारले परंतु वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे फक्त ४०% बेडच उपयोगात आहेत त्यामुळे आधीच आरोग्य सेवेत अंपग असलेल्या पालिका क्षेत्रात झपाट्याने वाढत असलेले रुग्ण आणि आरोग्य यंत्रणेवर वाढत असलेला ताण यामुळे सामान्य लोक हवालदिल झाले आहेत. यापुढे तपासणीची प्रक्रिया काय असेल याबद्दल पालकमंत्री आणि जिल्हाधिका-यांना माहिती नसून हे प्रशासकीय गलथान कारभाराचे प्रतिक असून नागरिकांनो तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो” असे अश्वासित करणारे राज्य सरकार नेमके काय करीत आहे? असे खडसावून विचारण्याची वेळ आली असल्याचं नितीन देशपांडे यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यामुळं पंतप्रधान या नात्याने आपण स्वत: तत्काळ लक्ष घालून दर आठ तासानी संपूर्ण अहवाल मागून घ्यावा आणि रुग्णांच्या मदतीसाठी चार आकडी स्वतंत्र टोल फ्री नंबर जाहीर करण्याचे आदेश निर्गमित करावे तसंच भविष्यात नागरी जीवन वाचवण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी, औषधे आणि वैद्यकीय साधने पुरविण्यास मदत करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षातर्फे करण्यात आली आहे.