गेल्या काही महिन्यापासून महाविकास आघाडीत बिघाडी असून कोणत्याही निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सामावून घेतलं जात नसल्यामुळे काँग्रेस नाराज असून आता तीच नाराजी ठाण्यातही उघडपणे समोर येऊ लागली असून काँग्रेसला विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी केला आहे. एकीकडे राष्ट्रवादीने पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांना पत्र देऊन आम्हालाही बोलावणे करा अशी मागणी केली असून नाराजी व्यक्त केली आहे. परंतु काँग्रेसने आता शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत आम्हाला दोघांपैकी कोण सामावून घेतो असा सवाल उपस्थित केला आहे. कोवीड रुग्णालयाचा शुभारंभ, पालिकेतील बैठकी यामध्ये आम्हाला डावलले जात असल्याचा धक्कादायक आरोप जाधव यांनी केला आहे.
राष्ट्रवादीने आदीत्य ठाकरे यांना निवेदन देऊन ठाण्यात जर कोणी मंत्री येणार असेल तर त्याची माहिती आम्हाला दिली जात नाही असा आक्षेप घेतला परंतु आता शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघेही काँग्रेसला डावलत असून आम्ही कधी नाराजी व्यक्त केली का असा सवाल जाधव यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे घटक म्हणून एकत्रीत काम करण्याची इच्छा असून आम्हाला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात असून काँग्रेसला शिवसेना, राष्ट्रवादीकडून वारंवार डावलले जात असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. ठाण्यात कॉंग्रेसला विचारतच घेतले जात नसून कोवीड हॉस्पीटलचा शुभारंभ, पालिकेतील बैठका याबाबत काँग्रेसला कोणी विचारात घेतले नाही. काँग्रेसही महाविकास आघाडीचाच घटक असून शहराची आणि नागरीकांची आम्हांलाही काळजी आहे. परंतु वारंवार डावलून आमच्यावर हा अन्याय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडीची ही ठिणगी ठाण्यात येऊन पोहचली असून जाधव यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी आता तरी कॉंग्रेसला विश्वासात घेतील का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.