ठाण्यातील ओरियन बिझनेस पार्कला लागलेल्या आगीच्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राठोड यांनी केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कापुरबावडी येथील ओरियन बिझनेस पार्कला काही दिवसांपूर्वी अचानक आग लागली होती. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राठोड यांच्या कंपनीत ३० ते ३५ कर्मचारी काम करत होते. आग लागल्याचं कळताच राठोड यांनी कर्मचाऱ्यांची ४ ते ५ जणांची टीम तयार करून लोकांना वाचविण्याचे काम केले तसेच आगीचे वातावरण आणि सर्व खातरजमा करून बिझनेस पार्क मधील इतर ऑफिस मध्ये काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सतर्क करून बाहेर काढण्यासाठी ते स्वतः देखील जीवाची बाजी लावून प्रयत्न करत होते. प्रत्येक फ्लोअरला जाऊन लोकांना बाहेर पडण्यास सांगत होते. या टीमने जवळपास २०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. राठोड यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या दुसऱ्या टीमने ओरियन बिझनेस पार्क मधील गाड्या आणि कार काढण्याचे अतोनात प्रयत्न करून अनेक गाडी आणि कार जळण्यापासून वाचविले त्यामध्ये त्यांची स्वतःची कारही जळून खाक झाली. यावेळी जीवाची पर्वा न करता सामाजिक कार्यकर्ते मिथुन राठोड, ऑफिस इन्चार्ज गोविंद जाधव, सचिन शुक्ला त्याच बरोबर कर्मचारी संजय माने, बलभीम पाटील, दत्ता माने , विचारे, शंकर नक्का या सर्वांनी माणुसकीला साजेसे काम केले. आगीचा भडका इतका मोठा होता की प्रथम आलेल्या फायरब्रिगेड टीमला आग आटोक्यात येत नव्हती. ओरियन बिझनेस पार्कचा तिसरा, चौथा आणि पाचवा मजला सर्वांच्या डोळ्यादेखत जळत होता. यावेळी प्रकाश राठोड यांच्या टीमने पहाटे पाच वाजेपर्यंत पोलिसांना आणि अग्निशमन दलाच्या जवानांना पिण्याच्या पाण्याची सोय देऊन इतर कामात मदत केली.