ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तास बंद राहणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा आणि वागळे प्रभाग समिती मधील काही भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या बारवी गुरत्व वाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतल्यामुळे शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे दिवा आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, मुंब्रा प्रभाग समिती मधील वाय जंक्शन ते मुंब्रा फायर ब्रिगेड परिसरापर्यंत आणि वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.