नववर्षाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री संस्कार भारतीतर्फे काढलेली रांगोळी पावसामुळे विखुरली गेली. परंतु संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी न डगमगता आज पुन्हा नव्या जोमाने रांगोळी साकारली. संस्कार भारतीच्या सुधा कर्वे यांनी ही माहिती दिली.
गावदेवी मैदानात जी-२० हा विषय घेऊन संस्कारभारतीच्या कार्यकर्त्यांनी भव्य रांगोळी रात्रभर मेहनत घेऊन साकारली होती. परंतु म्हणतात ना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना त्याप्रमाणेच भर उन्हाळ्यात पाऊस झाल्याने कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पाणी पडले. कार्यकर्त्यांच्या चेह-यावर रडू कोसळले.परंतु आज दुपारी पुन्हा ऊन पडल्यावर नव्या जोमाने तयारी करून पुन्हा ही रांगोळी साकारण्यात आली. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊन, तुम्ही फक्त लढ म्हणा, याची प्रचिती आली. विशेष म्हणजे संस्कार भारतीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुचित्रा जोशी या सगळ्यांनाच हुरूप देत होत्या.