ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा जिल्ह्याच्या विविध भागात नववर्षानिमित्त स्वागत यात्रेचं आयोजन

ठाणे जिल्ह्यामध्ये हिंदू नववर्ष म्हणजे गुढी पाडवा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा जिल्ह्याच्या विविध भागात नववर्षानिमित्त स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. शासनानं लागू केलेले करोना विषयक निर्बंध उठवल्यानंतर हा पाडवा आला असल्यामुळे तो जल्लोषातच साजरा होणार होता पण यंदा अवकाळी पावसाची छाया नववर्ष स्वागतयात्रेवर होती. पण सुदैवानं पावसानंही दांडी मारल्यामुळे गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात आलेली स्वागतयात्रा निर्विघ्न पार पडली. ठाण्यातील मुख्य स्वागतयात्रा ही कोपिनेश्वर मंदिरापासून सुरू झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौपिनेश्वराची पूजा केल्यानंतर रथयात्रेला सुरुवात झाली. रंगो बापूजी चौकात मुख्यमंत्र्यांनी पालखीवर पुष्पवृष्टीही केली. यंदा स्वागत यात्रेत जवळपास ६० हून अधिक रथ सहभागी झाले होते. विविध विषयांवरील हे रथ आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते. मात्र स्वागत यात्रा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्याचे दिसत होते. काही ठिकाणी यात्रेमध्ये बरीच मोठी जागा रिकामी होती, तर काही वेळा स्वागत यात्रा घाईघाईने पुढे नेली जात होती. ही बाब सोडली तर नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात संपन्न झाली. स्वागत यात्रेपुढे रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी केली जात होती. स्वागत यात्रा पाहायला ठाणेकरांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र दिसत होत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading