वटपौर्णिमेच्या निमित्तानं ठाण्यात एका ३०० वर्ष जुन्या आणि ठाण्याचं भूषण असणारा महाकाय वड जगावा यासाठी महिलांबरोबरच पुरूषांनीही पूजा करत वटपौर्णिमा साजरी केली. ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे या हेरिटेज वडाच्या पूजेसाठी आवाहन करण्यात आलं होतं. ३०० वर्ष जुन्या वारसा वृक्षाच्या हानीचे दर्शन ठाणेकरांना घडावे, ठाणे महापालिका क्लीन चीट देऊन ठाणेकरांना फसवत असल्याची माहिती जागेवर नेऊन दाखवणे, नैसर्गिक संसाधनांप्रमाणेच वृक्ष ही खाजगी मालमत्ता नसून सार्वजनिक मालमत्ता असल्यामुळं त्याचं रक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे ठाण्यातील सर्व पुरातन वृक्षांचं जतन व्हावं यासाठी जागर करणं अशा उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. लोढा बिल्डर्सनं या महाकाय वृक्षाला पत्र्यांचे कुंपण टाकलं आणि आत जाऊन पूजा करण्यास विरोध केल्यामुळं शेकडो नागरिकांनी वृक्षाजवळील रस्त्यावर पूजा केली.