ठाणे शहरात अंतर्गत मेट्रोमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी एक समिती नेमली जाणार आहे. विधान परिषदेतील आमदार निरंजन डावखरे यांनी या समस्येबाबत विधान परिषदेत आवाज उठवला होता. ठाणे शहरातील नियोजित अंतर्गत मेट्रोमुळे ठाण्याच्या जुन्या भागात होत असलेल्या अन्याय विरोधात त्यांनी सभागृहात आवाज उठवला होता. या अंतर्गत मेट्रोमुळे ठाणे रेल्वे स्थानक, नऊपाडा अशा जुन्या परिसरातील भागात अधिकृत इमारतींना पुनर्विकासासाठी मेट्रो कडून ना हरकत दिली जात नाही, यामुळे सुमारे 1300 कुटुंब अडचणीत आल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. या भागात विकास होत नसल्यामुळे जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवासी रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. त्याचबरोबर सामाजिक प्रश्नही निर्माण होत असल्याकडे त्यांनी लक्षवेधी द्वारे लक्ष वेधले होते. अद्याप अंतर्गत मेट्रोला राज्य आणि केंद्राकडून मंजुरी मिळालेली नाही मात्र तरीही ठाणे महापालिकेतून विकासकांना या भागात परवानगी दिली जाणार नसल्याचं सांगितलं जात असल्याचं डावखरे यांनी सांगितलं. या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन तालीका सभापती प्रसाद लाड यांनी सभापतींच्या दालनात एक बैठक बोलवण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर महामेट्रोचे कार्यकारी संचालक, स्थानिक महापौर, नगर विकास सचिव आणि स्थानिक आमदारांची एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा आश्वासनही सभागृहात दिल.