ठाणे शहराच्या सौंदर्यीकरणात स्वच्छतेला प्राधान्य देण्याबरोबरच व्यापकतेवर भर द्यावा आणि बारकाईने नियोजन करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. शहरातील स्वच्छतेविषयी विस्तृत आढावा घेतल्यानंतर अभिजीत बांगर यांनी सुशोभीकरणाची स्थिती, त्याचे नियोजन आदींचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या शहर सुशोभीकरणाविषयीच्या सूचना लक्षात घेऊन उत्तम दर्जाचे काम करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. स्वच्छ सर्वेक्षणात सातत्याने उत्तम कामगिरी करीत असलेल्या नवी मुंबईतील यशस्वी झालेल्या प्रयोगांचा दाखला यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला. पहिल्या टप्प्यात भिंती चित्रे, दुसऱ्या टप्प्यात कारंजी, शिल्प आणि तिसऱ्या टप्प्यात शहराची प्रवेशद्वारे असे सुशोभीकरण कार्यक्रमाचे नियोजन ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार प्रस्तावित कामाची फेररचना या टप्प्याप्रमाणे करावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. वेगवेगळ्या संकल्पनांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. त्याचा उपयोग करून आता सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी संकल्पना तयार कराव्यात. शहर सौंदर्यिकरण करताना परिसरानुरुप समर्पक चित्रे, असावीत याची काळजी घेताना उत्तम दर्जा राखला जाईल हे कटाक्षाने पहावे असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.