ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील नागरी कामांना गती देवून नागरीकांच्या तक्रारीचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना

ठाणे महापालिका परिक्षेत्रात नागरी सुविधेअंतर्गत सुरू असलेली कामे युद्धपातळीवर पुर्ण करणे, शहराचे सुशोभिकरण आणि संपूर्ण शहर शून्य कचरा करण्यासाठी योग्य नियोजन करणे, नागरिकांशी म्हणणे नम्रतेने ऐकून त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख यांना आज झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थेचे नागरिकांना मुलभूत सेवा पुरविणे हे कर्तव्य असून अधिकाधिक नागरिकांचा महापालिकेशी सातत्याने संबंध येत असतो. नागरिकांनी सामाजिक कामासाठी संबंधित प्रभागसमितीकडे संपर्क साधल्यास वा निवेदन दिल्यास त्याचा स्थानिक पातळीवर निपटारा होणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या कामांसाठी नागरिकांना मुख्यालयांशी संपर्क साधण्याची वेळ येवू नये या दृष्टीने प्रभाग समितीस्तरावर सर्व संबंधितांनी योग्य नियोजन करावे अशा सूचना आज झालेल्या बैठकीत देण्यात आल्या. तसेच नागरी विकासांतंर्गत संपूर्ण महापालिका क्षेत्रात विविध प्रकल्प कामे सुरू असून या कामांचा आढावा घेवून ही कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच घनकचरा हा महत्वाचा विषय असून संपूर्ण महापालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानातंर्गत सुरू असलेले काम अधिक गतीमानतेने करावे तसेच कचरामुक्त शहरासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पुर्तता करावी आणि संपूर्ण परिसर सुशोभित राहील या दृष्टीनेही विशेष लक्ष द्यावे असेही यावेळी नमूद करण्यात आले. सर्व अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडण्यात आणि कोणत्याही नागरिकांने त्यांचे कामाबाबत तक्रार केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, प्रत्येक अधिकारी वर्गाने त्यांचेकडे असलेला कामांबाबतचा अहवाल तयार करावा आणि आगामी काळातील उपक्रमांबाबतही नियोजन करावे. तसेच सर्व प्रभागसमिती अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचारी वर्गाने आपापसात सामंजस्याने सर्व कामे पुर्ण होतील या दृष्टीने काम करावयाचे आहे. तसेच कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचनाही या बैठकीदरम्यान देण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading