निसर्गातील पानं-फुलांप्रमाणे आपलं आयुष्य बहरून टाकावं असं मत महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून १२व्या वृक्षवल्ली २०२० या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन महापौरांच्या हस्ते झालं त्यावेळी महापौरांनी हे मत व्यक्त केलं. रेमण्डच्या मैदानावर या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाच्या निमित्तानं झाडं, फुलं, फळं आणि भाजीपाला यांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात ४५ स्टॉल धारकांसह १०० वैयक्तीक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. या प्रदर्शनात शोभिवंत पाना-फुलांच्या कुंड्या, वामन वृक्ष, निवडुंग, सकुलंट, ब्रोमेलियाझ, ऑर्किडस्, गुलाब पुष्प रचना, औषधी आणि सुगंधी तसंच वनस्पती, फळझाडं, फळांची मांडणी, भाजीपाला, उद्यान प्रतिकृती, निसर्ग आणि पर्यावरण आधारीत छायाचित्र, रंगचित्रांचं प्रदर्शन नागरिकांना पहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन उद्यापर्यंत सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत पाहण्यासाठी खुलं आहे.