कोरोना काळात रूग्णांनी भरलेल्या महागड्या बिलांचा परतावा मिळावा म्हणून ठाणे मतदाता जनजागरण अभियान आंदोलन उभारणार आहे. कोरोना काळात आरोग्य व्यवस्थेतील त्रुटीमुळे अनेक पातळ्यांवर रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान सोसावं लागलं. सार्वजनिक रूग्णालयांमध्ये जागा नसल्यामुळं खाजगी रूग्णालयाची अवाच्या सवा बिलं भरावी लागली. या साथीच्या काळात अनेकांना कर्जबाजारी व्हावं लागलं. जनकल्याणाची भाषा करणारे पण समर्थ सार्वजनिक आरोग्य व्यवस्था निर्माण न करू शकलेले सरकार आणि राजकीय पक्ष या लुटीला जबाबदार आहेत. ठाणे मतदाता जागरण अभियान अशा सर्व रूग्णांना त्यांनी भरलेल्या मोठ्या रक्कमेच्या बिलांचा परतावा मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी जनआंदोलन उभारलं जाणार असून वेळ पडल्यास न्यायालयातही दाद मागितली जाणार आहे. यासाठी १० डिसेंबरला एक मोठी सभा होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील रूग्णांनी ९८६७१००१९९ या दूरध्वनीवर संपर्क साधून आपली तक्रार द्यावी असं आवाहन अभियानातर्फे करण्यात आलं आहे.