ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी पोलीस ठाण्यात बेकायदा बसवून अधिकाराचा गैरवापर केल्याचा अभियानाचा आरोप

समूह विकास योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ नये म्हणून बेकायदा पोलीस ठाण्यात बसवून ठेवून नागरी स्वातंत्र्यावर घाला घातल्याप्रकरणी पोलीस अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं पोलीस आयुक्तांकडे केली आहे. समूह विकास योजनेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री ठाण्यात येणार म्हणून त्यांना समूह विकास योजनेतील आक्षेपांच्या संदर्भात अभियानातर्फे एक निवेदन दिलं जाणार होतं. मात्र हे निवेदन दिलं जाऊ नये यासाठी पोलीसांनी अभियानाची फसवणूक केल्याचा अभियानाचा आरोप आहे. पोलीसांबरोबर झालेल्या बैठकीत फक्त निवेदन दिलं जाणार असून निदर्शनं करण्याचा हेतू नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. पोलीसांनी यासंदर्भात पालकमंत्र्यांबरोबर भेट घडवून आणली त्यावेळी पालकमंत्र्यांनाही मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं असल्यानं तशी व्यवस्था करावी असं अभियानातर्फे सांगण्यात आलं होतं. पालकमंत्र्यांनी ते मान्य करून वागळे पोलीस तिथे घेऊन येतील असं सांगितलं होतं. मात्र पोलीसांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून अभियानाचे संजीव साने, डॉ. चेतना दिक्षीत, अनिल शाळीग्राम, प्रज्योती प्रभु, बाळा मांडकुलकर, भालचंद्र भोईर यांना बेकायदा तीन तास वागळे पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं आणि कार्यक्रम संपेपर्यंत या सर्वांना मुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्यातच आलं नाही. अभियानानं पोलीसांच्या या कृतीचा निषेध केला असून पोलीस उपायुक्त आणि पालकमंत्र्यांसमोर मान्य करूनही बेकायदा पोलीस ठाण्यामध्ये बसवून ठेवून नागरी स्वातंत्र्यावर घाला घालण्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading