केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाच्या ‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वाधिक पाच जिल्ह्यांनी बाजी मारली. यामध्ये उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार श्रेणीत ठाणे जिल्ह्याला गौरविण्यात आले आहे. ठाणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी ठाण्यासह सातारा, सिंधुदुर्ग, वाशिम आणि सोलापूर या विजयी जिल्ह्यांनाही उल्लेखनीय कार्यासाठी गौरविण्यात आले. नवी दिल्लीत केंद्रीय कौशल्य विकास -उद्यमशीलता मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते‘ जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेचे पुरस्कार वितरित करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील ४६७ जिल्ह्यांतून विजयी ठरलेल्या ३० जिह्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये यावेळी गौरविण्यात आले. या स्पर्धेंतर्गत देशभरातून १३ जिल्ह्यांना उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार श्रेणीत गौरविण्यात आले. यामध्ये ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. ठाणे जिल्हा हा महानगर परिक्षेत्रात येतो आणि जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के लोकसंख्या ही १५ ते ३० वयोगटातील तरुणांची आहे. त्यामुळे तरुणांना केंद्रस्थानी ठेवून विविध कौशल्य कार्यक्रमांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. जिल्ह्यात शहरी, ग्रामीण आणि आदिवासी अशा तिन्ही स्तरातील महिलांचे वास्तव्य आहे अशा महिलांचे स्थलांतर थांबविण्यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देवून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. येत्या काळात जिल्हयातील तृतीयपंथींयासाठी कौशल्य विकासकार्यक्रम राबविण्याची योजना असल्याचे सहायक आयुक्त कविता जावळे यांनी सांगितले.