धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेले काही दिवस चांगला पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणी साठ्यातही चांगली वाढ झाली आहे. जूनमध्ये दडी मारलेल्या पावसानं जून महिन्याच्या अखेरीपासून जोरदार हजेरी लावली होती. या जोरदार पावसामुळं शहरात पाणी साचणं, झाडं पडणं अशा घटना घडल्या तर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. १ जुलैला भातसा धरणात २४ टक्के तर बारवी धरणात १७ टक्के पाण्याचा साठा होता. तर आजघडीला यामध्ये भातसा धरणात २८ टक्के तर बारवी धरणात २२ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. गेल्या तीन दिवसात भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात ४ टक्क्यानं तर बारवीच्या पाणीसाठ्यात ५ टक्क्यानं वाढ झाली आहे. आजघडीला भातसा धरणात २६४ दशलक्ष घनमीटर तर बारवी धरणात ५३ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा झाला आहे.