येऊरसारखा जैवविविधतेने नटलेला डोंगर लाभलेल्या ठाणे शहराचा समावेश स्मार्ट सिटी मध्ये आहे. ‘स्वच्छ, सुंदर ठाणे’ शहर आता आणखीनच बदलू लागले आहे, शहरातील भिंती बोलू लागल्याने या शहराच्या सौंदर्यीकरणात आणखीनच भर पडत आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे शहराची वाहिनी समजल्या जाणाऱ्या परिवहन सेवेचे बदलते रुप लवकरच ठाणेकरांना अनुभवयास मिळणार असून ‘ब्रीथ ईझी, झिरो इंमिशन, नो नॉईज’ अशा पर्यावरणपूरक ई- बसेस ठाणे शहराला एक नवीन ओळख देणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले. स्वच्छ वायू कृती आराखड्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक योजना महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून इलेक्ट्रीकल बसेस उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे, यात अत्याधुनिक ई बसेस परिवहन सेवेच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत, यासाठीची संपूर्ण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त बांगर यांनी दिले. स्वच्छ हवा कृती आराखड्याअंतर्गत महापालिकेस अनुदान प्राप्त झाले आहे. या अनुदानातंर्गत 123 ई बसेस खरेदी करण्याचा कार्यादेश देण्यात आला आहे. जानेवारी अखेरपर्यत 32 ई बसेस प्राप्त होणार असून जून पर्यत उर्वरित 91 ई-बसेस प्रत्यक्ष सेवेत दाखल होणार आहेत, या बसेस दिलेल्या वेळेतच प्राप्त होतील याची दक्षता घ्यावी, जर याकामी विलंब झाला तर करारनाम्यातील अटीनुसार ठेकेदारास दंड आकारला जाईल असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले. नव्याने उपलब्ध होणाऱ्या बसेस महापालिका क्षेत्रात सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या डिझेल बसच्या मार्गिकेवर चालविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. जेणेकरुन नागरिक सार्वजनिक वाहतूकीवर भर देतील आणि परिवहन सेवेचे उत्पन्न प्रति किलोमीटर वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अनुदानाचा वापर जास्तीत जास्त ई-बसेस आणि इतर पर्यावरणपुरक कामांसाठी करण्याच्या सूचना बांगर यांनी दिल्या.