अतिवृष्टीच्या काळात ज्या सखल भागांमध्ये पाणी साचतं त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी केल्या आहेत. याबाबत ८ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. गेले तीन दिवस शहरामध्ये पावसाची संततधार होती. त्यामुळं शहरात अनेक ठिकाणी पाणी साचणं, वृक्ष पडणं तसंच आगी लागण्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. पाणी साचण्याच्या जागी कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल याचा अभ्यास करून आपला अहवाल सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी नगर अभियंत्यांना दिले. सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांनी पुन्हा नव्यानं स्थानिक नगरसेवकांच्या मदतीनं यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगानं प्रभाग समितीमध्ये फिरून पाहणी करावी, जेणेकरून भविष्यात कुठलीही दुर्घटना घडणार नाही असंही पालिका आयुक्तांनी या बैठकीत स्पष्ट केलं